Responsive Ads Here

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

विवेकानंद आश्रमाच्या संपर्कयात्रेस प्रारंभ


संपर्कयात्रेचे ठीकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत,१८ गावांत प्रार्थना मंडळाची स्थापना
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने काढण्यात आलेल्या संपर्कयात्रेस समाधीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली.


 विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांच्याहस्ते या संपर्कयात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, हभप. निवृत्तीनाथ येवले शास्त्री, विष्णूबुवा थुट्टे शास्त्री, मोतीरामदादा थोरहाते यांच्यासह विश्वस्त आणि पदाधिकारी या संपर्कयात्रेत सहभागी झाले होते. पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील सुमारे १८ गावांत ही संपर्कयात्रा पोहोचली होती, या गावांत प्रार्थना मंडळे स्थापन करण्यासह ग्रामस्थांना अध्यात्मिक प्रबोधन व कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्यासह विवेकानंद आश्रमाच्या कार्याची माहिती यावेळी वेदांताचार्य गजाननदादा यांनी दिली. आठवडाभर ही संपर्कयात्रा पंचक्रोशीतील गावांतून फिरणार आहे.
ही संपर्कयात्रा कर्मभूमी विवेकानंद आश्रमाच्या पंचक्रोशीत फिरत आहे. हिवरा आश्रमसह शिवाजीनगर, पोखरी, गजरखेड, पिंपळगाव, लव्हाळा, मोहखेड, माळखेड, खुदनापूर, सारशीव, पाचला, एकलारा, बोरगाव काकडे, पळसखेड, लोणी, पेनटाकळी, कासारखेड, थार, रायपूर, दुधा या गावांत ही संपर्कयात्रा पोहोचली होती. यावेळी वेदांताचार्य गजाननदादांनी जातीभेद विरहित समाजनिर्मितीचे स्वप्न कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी पाहिले होते. विवेकानंद म्हणाले होते, खेड्यापाड्यांत जाऊन शिक्षण, आरोग्यसेवा देण्याचे काम करा. दुःखी, पीडित जीवांची सेवा हीच खरीखुरी ईश्वरसेवा आहे. हिच शिकवण महाराजांनी प्रत्यक्ष कृतीत आणली. विवेकानंद आश्रम ही संस्था आपल्या सर्वांची असून, तेथे उपलब्ध आरोग्य, शिक्षण, कृषी, आणि सेवेच्या उपक्रमांचा सर्वांनीच लाभ घ्यायचा आहे. आपण केलेली प्रार्थना ईश्वरापर्यंत जाते, आणि त्याचे उत्तमोत्तम आशीर्वाद खाली येत असतात, तेव्हा गावोगावी प्रार्थना मंडळे स्थापन केल्यामुळे सदाचारी आणि ईश्वरनिष्ठ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादनही यावेळी गजाननदादा शास्त्री यांनी केले. या संपर्कयात्रेत आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरुषोत्तम अकोटकर, राजेंद्र आव्हाळे, माजी उपसभापती बबनराव लहाने, पंढरीनाथ शेळके, गंगाधर निकस, हभप. निवृत्तीनाथ येवलेशास्त्री, विष्णू थुट्टेशास्त्री, शिवदास सांबापुरे, वसंतअप्पा सांबापुरे, संजय भारती, एकनाथ आव्हाळे, मोतीरामदादा थोरहाते यांचा सहभाग आहे.

प्रार्थना ही मन व चित्तशुद्धी करते. शुद्धचित्ताची माणसे चांगला परमार्थ करतात. त्यांच्या आचारविचारात परिवर्तन होते. आणि, अशा माणसांमुळेच समाज सुखी होत असतो. हा सुखी समाज निर्माण करण्यासाठीच विवेकानंद आश्रमातर्फे संपर्कयात्रा काढण्यात आली आहे. गावोगावी प्रार्थनामंडळे स्थापन करण्यामागेही हाच उद्देश आहे.
                                                                        - संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा