Responsive Ads Here

शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

विवेकानंद कृषि महाविद्यालय देशभक्तीच्या घोषवाक्यांनी दुमदुमले !


 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव आहे. यानिनित्ताने शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविल्या जात आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तहर घर तिरंगाया उपक्रमांतर्गत येथील निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने  प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी शनिवारी ता.१३ रोजी हर घर तिरंगा जनजागृती अभियान रॅली आयोजन करण्यात आले होते . विवेकानंद कृषि महाविद्यालय परिसरात सकाळी ७.३० वाजता विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर  विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढली. या रॅलीत विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी,विद्यार्थीनींनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत गावामध्ये हर घर तिरंगा अभियानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यावेळी घर हर मे तिरंगा हर मन तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान, चला घरोघरी तिरंगा फडकू स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने,हर्ष आणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करू या, तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकवू चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवूच्या घोषणांनी  हिवरा आश्रम परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीच्या घोषवाक्यांनी परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. रॅलीमध्ये शैक्षणिक विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मंगेश जकाते.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशिल दळवी,कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतिक उगले यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.  

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

विवेकानंद आश्रमात आदिवासी दिन उत्साहात

दरवर्षी विवेकानंद आश्रमात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी मंळवारी (ता. ९ ) रोजी आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद आश्रमात विविध जाती धर्माचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तायुक्त शिक्षण, स्वावलंबी जीवन, निसर्गरम्य व धर्माष्ठित परिसर यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. विवेकानंद ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.शाम ठोंबरे हे होते. सुरूवातीला परिसर स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा या प्रसंगी आयोजित करण्यात आल्या. सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते करण्या आले. आदिवासी समाज हा या देशाचा मुळ निवासी असून जल,जमीन आणि जंगल या घटकांचे रक्षण करत आहेत. आदिवासींचे सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृध्द असून राष्ट्रभक्ती ही या समाजाचे गुणधर्म आहे. इंग्रजा विरूध्द लढतांना या समाजाने बिरसा मुंडा सारखे थोर क्रांतीकारक या देशाला दिले. आज या समाजातील विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेवून जगाशी स्पर्धा करण्यात समर्थ आहेत असे विचार डॉ.शाम ठोंबरे यांनी काढले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आपल्या सेवा कार्याची सुरूवात आदिवासींच्या जंगल्यातील वाडी वस्त्यांवर जाऊन केली. त्यांना आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांचे पुरताता करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक आदिवासी गावे विवेकानंद आश्रमाने विकासासाठी दत्तक घेतली,आज त्या गावाचा मोठया प्रमाणात परिवर्तन दिसून येत आहे ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासींचे नृत्य,त्यांची कला तसेच बिरसा मुंडा यांच्या जीवनावर समायोचित भाषणे केली. कार्यक्रमासाठी डॉ. दिपक जामकर, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, विद्या मंदिराचे प्राचार्य आर. डी. पवार, विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत यांनी केले. कार्यक्रमासाठी विवेकानंद ज्ञानपीठचे व वसतिगृहातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

विवेकानंद आश्रम परिसर माणूस घडविणारा- तहसिलदार डॉ.संजय गरकल


 शिक्षण माणसाला शहाणपण देते,सुज्ञपणा देते,लोकशाही मूल्यांची व विधायक कार्यासाठी लागणारी वर्तनक्षमता शिक्षणाने प्राप्त होते. शैक्षणिक दृष्टया अत्यंत सुयोग्य असलेला हा परिसर आहे. या ठिकाणी शिक्षणासोबत इतर मूल्यांची बांधलकी जोपासत सुजान नागरीक तयार होतो. कारण विवेकानंद आश्रमाचा परिसर हा माणूस घडविणारा आहे असे विचार मेहकरचे तहसिलदार डॉ. संजय गरकल यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता.८) रोजी पदवी वितरण बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील होते. पदवीनंतर उच्चशिक्षण घेवून विविध क्षेत्रात करीयर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमाची कास धरावी. सेवाक्षेत्रात काम केल्याने देशाची सेवा घडते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सव वर्षात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  अमरावती विद्यापीठाच्या संग्लनीत असलेले हे महाविद्यालय गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वदूर परिचीत आहे. शिक्षणासोबतच स्वावलंबन,संस्कार या गुणांची पायाभरणी महाविद्यालयीन जीवनातच होत असल्याने विद्यार्थी जीवनात यशस्वी होत आहेत. यावर्षीच्या गुणवत्ता यादीत मुलींची संख्या जास्त असल्याचे समाधान आहे असे विचार प्राचार्य डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व पाहूण्यांच्या स्वागतांने झाली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विषयांच्या १०९ विद्यार्थ्यांना पदवी वितरण कारण्यात आली. शाम शेळके व प्रतिक्षा गवई या  पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा व प्रात्यक्षिक परिक्षांचा सराव अत्यंत उपयुक्त ठरला असून भविष्यात पदव्युत्तर पदवीसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा लाभही या महाविद्यालयातून झाला असून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील,प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन वैष्णवी बोरकर,अनुजा चंद्रवंशी तर आभारप्रदर्शन इश्वरी आमले हीने केले.

मंगळवार, १७ मे, २०२२

विवेकानंद आश्रमात बुध्द पौर्णिमा साजरी

 


विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी करण्यात आली. विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दाच्या प्रतिमेसमोर भाविक जमा झाले होते. सकाळी ८ वाजता झालेल्या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भगवान बुध्ददेवांनी संपूर्ण जगाला शांती आणि करूणेचा संदेश दिला. सर्व जीवांशी करूणेच्या भावनेतून वागणूक निर्माण झाली तर सर्व व्देष आणि शत्रूमुक्त जीवन जगतील. परस्परांचे सहजीवन चारित्र्य नावाच्या मूल्यांने जोडले गेल्यास ते जीवन सुखी आणि सार्थकी होईल असे विचार संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. भगवान बुध्दांच्या जीवनातील सर्व पैलू व त्‍यांचा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून व प.पू.शुकदास महाराजांच्या चरित्रातून आढळतो. मानवाचे कल्याण हाच बुध्दतत्‍वज्ञानाचा पाया आहे. समाजाची सेवा करण्यासाठी विवेकानंद आश्रमात सुरू झालेले सेवाउपक्रम ही खरी उपासना असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर.डी.पवार,डी.भास्कर महाराज,अशोक गिऱ्हे व माजी नायब तहसिलदार बी.टी.सरकटे यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व परिसरातील नागरीक मोठया उपस्थित होते. 

सोमवार, १६ मे, २०२२

विवेकानंद स्मारक राज्यातील अग्रगण्य पर्यटन केंद्र बनणार - आ.डॉ.संजय रायमूलकर

 

शासनाची पर्यटनक्षेत्र विकासाची महत्‍वकांक्षी योजना आहे. पर्यटनक्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराची समस्या कमी होऊन वाढत्‍या व्यवसाने महसूलातही भर पडते. बुलडाणा जिल्हा पर्यटनदृष्टया महत्‍वाचा असून जिल्हयातील सिंदखेड राजा, लोणार, विवेकानंद आश्रम,  शेगाव इत्‍यादी पर्यटनस्थळे विकासाच्या टप्यात आहेत. मेहकर मतदार संघात असलेले विवेकानंद स्मारक हे अव्दितीय असे पर्यटनकेंद्र बनून नावारूपास येत असून कोराडी धरणाच्या मध्ये असलेल्या सहा एकराच्या बेटावर निर्माण केलेले विवेकानंद स्मारक हे अल्पावधीतच राज्यातील पर्यटनक्षेत्रांच्या यादीत अग्रगण्य केंद्र बनणार असल्याचा आशावाद मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी रविवारी (ता. १५) रोजी विवेकानंद स्मारकास भेट दिल्यानंतर बोलतांना व्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी त्‍यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्‍यांच्या सोबत संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. बोटीने विवेकानंद स्मारकावर जाऊन त्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्‍न करेल व शासन दरबारी पाठपुरावा करून विकासासाठी निधी खेचून आणेल असे विचार त्‍यांनी यावेळी व्यक्त केले. पर्यटन हा व्यवसाय असून पर्यटकांच्या संख्येवर व त्‍यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांवर हा व्यवसाय अवलंबून आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारका नंतर देशातील हे सर्वात मोठे विवेकानदं स्मारक बनणार असल्याचे व त्‍यासाठी विवेकानंद आश्रमासोबत शासनाच्या सहकार्याने मदत करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. स्मारकानंतर त्‍यांनी हरिहरतीर्थाला भेटी दिली. या ठिकाणी असलेले मनमोहक शिव गार्डन सुध्दा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. या परिसरातील प्राचीन मंदिरे अखंड वाहणारी जलधारा,गो संगोपन केंद्राला त्‍यांनी भेट दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती दिलीपबापू देशमुख,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,माजी अध्यक्ष महाराष्ट्र अर्बनचे बबनराव भोसले,जि.प.सदस्य तथा गटनेते आशीष रहाटे,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,माजी उपसभापती बननराव लहाने,माजी.पं.स.सदस्य गजानन पाटील,सरपंच मनोहर गिऱ्हे,शाखा प्रमुख विठ्ठल भाकडे,पत्रकार यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


रविवार, १५ मे, २०२२

विवेकानंद ज्ञानपीठच्या सौरभची नवोदयसाठी हिमाचलमध्ये निवड


 विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक संकुल हे नर्सरी ते पदवी पर्यंतच्या दर्जेदार व गुणवत्‍तायुक्त शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी सुरू केलेला आरोग्य, कृषी, शिक्षण, ज्ञाननिर्मिती, ग्रामविकास त्‍यातून मानव कल्याणाचा महायज्ञ आश्रमात तेवत ठेवला आहे. संस्थेव्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठ  ही निवासी  इंग्रजी माध्यमाची शाळा अल्पावधीच यशाचे अनेक शिखरे पार करीत आहे. नुकत्‍याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ज्ञानपीठात शिकलेला सौरभ कुरूडे यांची नवोदय विद्यालयातून पुढील शिक्षणासाठी हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. सौरभ हा विवेकानंद ज्ञानपीठात  शिक्षण घेतलेला व वसतिगृहात राहीलेला विद्यार्थी आहे. मूळचा हिंगोली जिल्हयातील सौरभ पाचव्या वर्गापर्यंत त्‍याने विवेकानंद ज्ञानपीठात शिक्षण घेतले. सहाव्या वर्गात त्‍याची नवोदय विद्यालयात शेगांव येथे निवड झाली. शेगाव येथील विद्यार्थ्यांमधून वर्ग ९ वी साठी त्‍याची हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. विवेकानंद आश्रमात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सौरभ सारख्या ग्रामीण भागातून व गरीब कुटूंबातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आश्रमाचे शैक्षणिक संकुलाने जीवनात यश मिळवून दिले आहे. शैक्षणिक गुणवत्‍ता देण्यासाठी हा परिसर सदैव तयार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या ज्ञानपीठात शिक्षणासोबतच नवोदय विद्यालयासाठी व स्कॉलरशिपसाठी  तयारी वर्गाचे नियोजन केल्या जाते.त्‍याचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे.  सौरभच्या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्‍याचे कौतुक केले आहे.

 

 

बुधवार, ४ मे, २०२२

कृतिशील शिक्षकाच्या शिबीरातून तेवली चिमुकल्यांच्या ज्ञानाची ज्योती !

हिवरा आश्रम : शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनंत शेळके 
आधुनिक जग हे खूप गतिमान आहे. संगणक आणि स्मार्टफोनच्या विश्वात चिमुकल्यांचे भावविश्व कोमजून जात आहे. माणूसकी,आत्‍मीयता दया, परोपकार, अध्यात्‍म या गोष्टी हद्दपार होत आहे. त्‍यामुळे भावी पिढीमध्ये सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल व उद्याच्या सुसंस्कृत पिढीच्या जडणघडणीसाठी संस्कारक्षम मानसिकता व दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे. बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून चिमुकल्यांना हसतखेळत शिक्षणाचा आनंद लुटता यावा. मुलांच्या दर्जेदार व सर्वांगिण शिक्षणाची ही गरज ओळखून हिवरा आश्रम येथील विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. विवेकानंद ध्यान केंद्राव्दारे आयोजित शिबीराला १ मे पासून प्रारंभ झाला असून हे दि.१६ जून रोजी सदर शिबीराचा समारोप होणार आहे. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्‍व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील १५० ते २०० मुलांचा सक्रिय सहभाग मिळाला आहे. बालमनावर नैतिकता, निर्भीडपणा, सत्‍याचरण, निर्व्यसनी, प्रामाणिकता, सचोटी,थोर महापुरूषांचे जीवनचरीत्रा सोबत मूल्यांचे संवर्धन या शिबीरात सातत्‍याने होत असल्याची माहिती विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना दिली. या शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरण, तणावमुक्त शिक्षण पध्दतीत शिकविले जाते. विवेकानंद ध्यान केंद्राच्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना मिळून मुलांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. परिसर,पर्यावरण,समाज,स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.

  चिमुकल्यांना शाळेबाहेच्या जगाची अनुभूती 
 या बालसंस्कार शिबीरात श्लोक,सुसंस्कार, इंग्रजी भाषा, संभाषण कौशल्य, बौध्दिक क्षमतांचा विकास, चर्चा सत्र, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम, कागदापासून पिशवी व फुले बनविणे, चित्रकला, रंगभरण स्पर्धा, मनोरंजक खेळ, स्टेज डेअरींग, प्रार्थना, कथाकथन, हरिपाठ, पाऊली या विविध विषयावर शिक्षकतज्ञ शिबीरार्थींना मार्गदर्शन करीत आहे.

 कोरोनामुळे उन्हाळी शिबीराला खंड पडला मात्र आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे यावर्षी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. या उन्हाळी शिबीराच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. संस्काराच्या शिदोरीतून नवीन पिढी घडत आहे. यामध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्‍यंत गरज आहे. त्‍यामुळेच या शिबीरात उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात येत आहे.
  अनंत शेळके संचालक विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रम

रविवार, १ मे, २०२२

अष्टावधानी निवेदक : शिक्षक अरविंद शिंगाडे

आपल्या निसर्गदत्त निवेदन शैलीच्या जोरावर, कल्पक शब्दफुलांच्या मोगऱ्याच्या दरवळाने अनेक राज्यस्तरीय समारंभमध्ये श्रवण सौख्यच्या हिरवळी फुलवत, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून मान्यवरणसह रसिकाना वैचारिक मेजवानीची दिव्य भेट प्रदान करून,, काळजात भरजारी वस्त्र विणणारे महाराष्ट्रातील खायत्नाम अष्टावधानी निवेदक, एक संवेदनशील बहुआयामी साहित्यिक, अभ्यासू व व्यासंगी वक्ते तथा महापुरुष्याच्या जीवनाचे भाष्यकार,वऱ्हाडी भाषेतील लोकमान्य कथा कथनकार,स्तंभलेखक, हजारो विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन करणारे बुलढाणा डायटचे कौनशिलर, मुक्त पत्रकार, उत्तुंग प्रतिभासम्पन्न कवी, प्रभावी समुपदेशक, सामाजिक तीव्र भान व तळागाळातील समाजातील शोषितांच्या जगण्याचा वैशाख आपल्या लेखणीतून प्रकट करणारे द्रष्टे समाजाभिमुख लेखक, उदंड लोकप्रियता लाभलेले अग्रगण्य सूत्रसंचालक, ब्रिटिश कौन्सिल या जागतिक संस्थेचे राज्य स्तरीय तजमार्गदर्शक, आपल्या अंगी असलेल्या उपजत नेतृत्व, कर्तृत्व, व वक्तृत्व गुणाने विविधांगी क्षेत्रातील अनेक कार्यक्रमातील उत्तम व यशस्वी संयोजक म्हणून साहित्य, शिक्षण, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वाना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक मानवनिष्ठ चळवळीचे पुरस्कर्ते, विदयार्थी प्रेमात आकंठ बुडालेले उपक्रमशील उत्तुंग व दैदीप्यमान कल्पकतेचे धनी, बुलढाणा जिल्ह्यासाह अनेक सामाजिक व पर्यावरण प्रकलपांचे आधारवड, अशी कित्येक सार्थ विशेषणे ज्यांची आभूषणे आहेत, असे महाराष्टातील ख्यातानाम अष्टपैलू साहित्यिक, आदरणीय अरविंदजी शिंगाडे सर यांचा आज वाढदिवस. आदरणीय सरांना सर्व प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "वेडे हवे जगाला तारून न्यावयाला घे एक वेडं कुठले माणूस व्हावायला "' या ओळीचे सारथी बनत, जिद्द चिकाटी, अभ्यासू वृत्ती, व्यासंगी वृत्ती, व जिज्ञासा या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यवर्तुळत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठल्याही कार्यक्रमातील त्यांचे बहारदार संचलन अनेकांना भावून जाते. कोणताही कार्यक्रम म्हटला की सूत्रसंचलन महत्वाचे असते. अरविंद शिंगाडे यांचे विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमातील संचलनासोबत विविध काव्य मैफीलींचे निवेदन रसिकांची दाद मिळविणारे असते . संचलन कसे करावे ? त्यातील बारकावे समजतील अशा अत्यंत सोप्या शब्दात अरविंद शिंगाडे सर यांनी 'सुत्रसंचालनाची सुत्रे ' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या या पुस्तकाला भरघोस असा प्रतिसाद सुध्दा मिळाला. विशेष म्हणजे हे पुस्तकरूपी अनमोल धन अनेक चाहत्यांच्या घरापर्यंत मोफत घर पोहोच करत, आगळी वेगळी कृतिशील साहित्य निष्ठा त्यांनी अधोरेखित केली आहे.सोबतच त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे 'क करिअरचा ' हे ई - बुक सुद्धा प्रकाशित झाले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी करिअर कौन्सिलिंग, मानसशास्त्रीय समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन तसेच वक्तृत्व व निवेदनाच्या कार्यशाळा घेण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो." "बुडते हे जन, न देखवे डोळा! म्हणोनी कळवळा येत असे!" ह्या संत वचनाचे सारथ्य पत्करून ते मार्गस्थ होतं, अनेक विदयार्थ्यांना उत्तम करिअर ची संजीवनी बहाल करत आहेत. मोबाईल द्वारा त्यांनी घेतलेल्या अनेक करिअर ऑनलाईन कार्यशाळा प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांनी आकाशवाणी जळगाववरुन भाषण सुध्दा दिले आहे. त्यांनी एका शैक्षणिक लघुचित्रपटात शिक्षकाची भूमिकाही केलेली आहे . त्यांचे वऱ्हाडी बोलीतील ' ऑफ पिरियड ' हे शैक्षणिक स्तंभलेखन सर्वदूर परिचित आहे. कथाकथन, कथालेखनही ते करतात .मराठी भाषेतील विविध बोलींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्यातील उपक्रमशील शिक्षक यांनी स्थापन केलेल्या मायबोली प्रतिष्ठानअंतर्गत अनेक कवितांचा 'वऱ्हाडी ' बोलीतून अनुवाद ते करीत असतात. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन नेहमीच करत असतात. कानातून मनात आणि मनातून हृदयात उतरविण्याचं प्राबल्य यांच्या दमदार प्रबोधनात जाणवते. याच कारण त्यांचं प्रबोधन फक्त स्टेज पुरतं मर्यादित नाही, करणी आणि कथनी यामध्ये एकवाक्यता आणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड अनेकांना भावते. "पुढे स्नेह पाझरे,, मागे चलती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा माझी """ ही दिव्य अनुभूती त्त्यांच्या लेखणी आणि वाणीमधून प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अभिजात मराठी शिक्षक साहित्य संघ अशा साहित्यिक व विवेकी चळवळीमध्ये अरविंद शिंगाडे यांचा नेहमीच प्रामुख्याने सहभाग राहला आहे. त्यांना दोन्हीही मुली आहेत. मोठी मुलगी MBBS मध्ये शिकत असून दोघींनाही उच्चशिक्षित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसावे, तसे कर्तृत्व त्यांच्या अवन्ति मुलीने सिद्ध केले आहे.स्कॉलर शिपच्या परीक्षेत अव्व्ल स्थान पटकवात आपल्या गुणवत्तेची चुनुख सिद्ध केली आहे, तिच्या दर्जेदार कविता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्याची प्रचिती, सरांचा वकृत्वाचा वारसा तिच्यात संक्रमित झाल्याची दिव्य प्रचिती येते. समाजाच्या सर्वच स्तरात समरस होण्याची निसर्ग दत्त संवेदना लाभल्याने खूप मोठा चाहता वर्ग महाराष्ट्र भर विस्तारित आहेत. मैत्रीच्या बाबतीत सर तर कुबेर आहेत. अफाट लोकसंसंग्रह आणि प्रचंड व्यस्त अशी जीवन शैली असतांना देखील,, मित्रासाठी काहीपण,,,, हा त्याचा मूळ स्वभाव. "आपण आहोत "हे त्यांचे शब्द अनेक मित्रांना भक्कम बळ देतात. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रमच्या वतीने राज्यस्तरीय सेवासमर्पण पुरस्कार २०१५ सुध्दा त्यांना मिळाला आहे. अशा या अल्पावधीत सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिक्षक अरविंद शिंगाडे सर यांचा प्रेरणादायी प्रवास खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या विविधांगी पैलूवर प्रकाश टाकताना शब्दांच दारिद्र्य वेळोवेळी जाणवते. आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर त्यांनी गझल नवाब भीमराव दादा पंचांळे यांच्या स्वर मैफिलीचे उत्कृष्ट निवेदन करत. "जैसे साच आणि मवाळ! मितले आणि रसाळ! शब्द जैसे कल्लोळ! अमृताचे " ही दिव्य अशी अमृतानुभूती घडवून दिली. विद्वता प्रखर, जळजळीत, तेजस्वी असते असं आपण नेहमीच म्हणतो, परंतु विद्वता शारदेच्या चांदण्यासारखी शीतल असते, याचा अनुभव सरांच्या सहवासात तुम्हास नक्कीच मिळेल. त्यांचं अभिष्टचिंतन करतांना त्यांचं व्यक्तिमत्व शब्दबद्ध करतांना एवढंच म्हणावं लागेल, "पायाखाली घ्यावी दुनिया नितीने कमवावी भाकरं. जीवच व्हावा असा गोड की अश्रूतूनही यावी साखर.. श्री.अनंत शेळके शिक्षक हिवरा आश्रम मो.9373836853

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

आश्रम जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य - संतोष गोरे

पर्यावरण सुरक्षा ही जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवाला जीवन देणारी व संगोपन करणारी वसुंधरा क्षतीग्रस्त होत आहे. तीला निरोगी ठेवणे आवश्यक झाले आहे. वाढती औद्योगीक प्रगती व विकासाच्या नावाने वाढलेला चंगळवाद, भोगवादी संस्कृती, नैसर्गिक साधनचा अतिरेकी वापर व त्‍यातून मानव प्राप्त करीत असलेला आनंद या समस्येवर आश्रमाची जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य दडलेले आहे असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी बोलतांना व्यक्त केले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिनानिमित्‍त्त आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना सचिव संतोष गोरे म्हणाले की, आश्रम जीवनशैली ही ज्ञान प्रदान, श्रम प्रधान व कर्मप्रधान आहे. नैसर्गिक संसाधनाचा मर्यादीत वापर व धर्माचरण हे या जीवनशैलीचे प्राण घटक आहेत. आपल्या नंतरही या पृथ्वीवर इतर जीवांना जगता यावे. त्‍यांच्यासाठी शुध्द हवा, शुध्द पाणी, शुध्द अन्न मिळावे व निसर्गचक्र शाश्वत पध्दतीने चिरकाल टिकावे ही भावना विदयार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हवी असलेली वातावरण निर्मिती या जीवनपध्दतीत सापडते. वाढते तापमान व आर्दता तसेच प्लास्टिकचा अतिरेकी वापर व पॅकिंग फूड यामुळे मानवाचे आयुष्यमान कमी होत असून जगणेही असह्य होत आहे. विद्युत, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट यांचा वाढता वापर पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आणत आहे. जैव विविधता धोक्यात आली आहे. समृध्द पर्यावरण माणसाला शाश्वत जीवन देत असते. समाज आणि पर्यावरण ही विकासाची दोन चाके आहेत त्‍यांना चालना देण्यासाठी जैव रसायनांचा व जैव स्त्रोतांचा वापर होणे गरजेचे असल्याचेही त्‍यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे होते. त्‍यांनी पृथ्वी दिनाचे घोषवाक्य पृथ्वीवर गुंतवणूक करा असे आहे. आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेक प्रकारची गुंतवणूक केली. पण या सगळयात दुर्दैवाने पृथ्वीच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या गेले नाही. वसुंधरेच्या बाबतीत सगळया देशांनी व जगातील सर्व नागरीकांनी गंभीर होणे गरजेचे आहे. तरच भविष्यात मानव सुखाने पृथ्वीवर जगू शकतो असे त्‍यांनी सांगितले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके यांनी केले.व्यासपीठावर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मधूरा सातपूते,प्रा.जयपक्राश सोळंकी होते. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

बुधवार, २० एप्रिल, २०२२

चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी !

मेहकर तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान जोरात
दहा दिवसांनी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष संपणार आहे. महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल जाहिर करण्यात येतात. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षाची नांदी सुरू झाली आहे त्‍यामुळे चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी लागल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील झेडपीच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राखविण्यात येत आहे. पाहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहे हे विशेष. दोन वर्षांपासून शैक्षणिक नियोजन कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षात नियोजन सुव्यवस्थीत व्हावे यासह शिक्षण विभाग सूचना देत आहे. यातचे शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांचा मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यातील अनेक शाळांमधून पूर्वतयारी अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सहा वर्षपूर्ण झालेलया बालकास इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षातील मुलांची यादी शाळांकडून जमा केली जात आहे. सदर यादीतील वयानुसार पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांसाठी उपक्रम घेतले जात आहेत. पालक भेटीतून विद्यार्थ्यां प्रवेशबाबतची परिपूर्ण माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार सात विविध टप्प्यांवर निरिक्षण केले जात आहे. हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १४ रोजी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फेरी काढून गावात इयत्‍ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची वजन, उंची, दोरीवरच्या उडया घेवून अभ्यासाविषयाची शैक्षणिक साहित्‍य देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, सरीता पवार, दत्‍तात्रय दशरथे, मिनाक्षी बंगाळे, संदीप पुरी, आशा साखरे यांनी अथक प्रयत्‍न केले. सध्या शाळापूर्व तयारी अभियान घेण्यात आले. प्रवेशसाठी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी पुढील शैक्षणिक वर्षात पहिली वर्गतील प्रवेशपात्र विद्यार्थी आणि पालक मेळाव्यात जनजागृती करण्यात आली. प्रकाश दुनगू, मुख्याध्यापक जि.प.के.म.प्रा.शाळा हिवरा आश्रम असे आहे शाळापूर्व तयारीची टप्पे विद्यार्थ्यांची नोंदणी, विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास, बौध्दिक विकास, विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक विकास,विदयार्थ्यांचा भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकाचा सहभाग असे शाळा पर्व तयारीचे टप्पे आहेत.

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

भगवान महावीरांची करूणा जगाच्या कल्याणासाठी - आर. बी. मालपाणी

विवेकानंद आश्रमात भगवान महावीरांचे पूजन 
 भगवान महावीरांचे जीवन त्‍याग, सेवा, संयम आणि करूणा प्रधान आहे. ते जितेंद्रीय होते. भोगासाठी तडफडणारे इंद्रिय नियंत्रणात ठेवून त्‍यांच्यार विजय मिळविल्यामुळेच ते महावीर ठरले. त्‍यांच्या जीवनात त्‍याग आणि संयम व मानव प्राण्याबद्दलची करूणा व त्‍यासाठी त्‍यांनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग ही काळाची गरज आहे. भगवान महावीरांची क्षमाशीलता व करूणा जगाच्या कल्याणासाठी  व जीवाच्या अस्तित्‍वासाठी महत्‍वाचे साधन बनले आहे असे उदगार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी संस्थेत संपन्न झालेल्या महावीर जयंती निमित्‍त बोलतांना व्यक्त केले. करूणा व क्षमा हे साधुच्या जीवनाचे मुख्य अंग आहे. आज जगात वर्णवर्चस्ववाद, साम्राज्यवाद व विनाशकारी युध्दाचे ढग जमा झालेले असतांना भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा मंत्र मानवाच्या भल्यासाठी तसेच त्‍यांचा जीवो और जीने दो हा संदेश मानव जातीसाठी आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. चंगळवादी जीवनशैली व विस्तारवादी मानसीकता अन्यायवृत्‍तीला जन्म घालते. प्रेषीतांनी व संतांनी मानवाचा जन्म सत्‍कर्मासाठी, त्‍याग व संयमाच्या कसोटीचे पालन करण्यासाठी असल्याचा उपदेश केला आहे. भगवान महावीरांचे असंख्य अनुयायी त्‍यांच्या या तत्‍वांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. सुरूवातीला आश्रमात असलेल्या भगवान महावीरांच्या प्रतिमेचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रतिमेचे विधियुक्त पूजन करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते व इतरांनी प्रतिमेचे पूजन केले. दिवसभर आलेल्या भाविकांना त्‍यानिमित्‍त अन्नदान करण्यात आले.