Responsive Ads Here

गुरुवार, ७ जून, २०१८

विवेकानंद आश्रम म्हणजे जनकल्याणाचा वसा - प्रख्यात समाजसेविका सिंधुताई सपकाळ


माणसाचे जीवन अमूल्य आहे. जीवन जगतांना येणा-या 
दुःखाने,नैराशाने खचून न जाता जे आयुष्य वाटयाला आले त्याचे सोने करता आले पाहिजे. माझे जीवन घडतांना मला त्याचा प्रत्यय आला आहे. असेच माणसाला दुःखमुक्त करण्याचा ध्यास घेतलेल्या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाच्या एका व्रतस्थ संन्यासाने निर्माण केलेला विवेकानंद आश्रम हा जनकल्याणाचा वसा घेतलेली संस्था आहे असे उदगार प्रख्यात समाजसेविका उर्फ माई यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेटी प्रसंगी मंगळवारी (दि.५) रोजी संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयातउपस्थित पत्रकारांशी संवाद साधतांना काढले. शुकदास महाराजांच्या पश्चात ते गेल्याने मोठी पोकळी निर्माण होणे साहाजिक आहे परंतु त्यांच्या सावलीत परिपक्व झालेली देवमाणसं अजूनही त्याच्या सेवेचा वसा तेवढयाच ताकतीने समर्थपणे चालवित आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे. खुप वर्षा अगोदर मी आश्रमात आले होते. माझ्या जीवनाचा संघर्ष पाहून महाराजांचे डोळे भरून आले होते. त्यांनी मला जगण्याचे बळ दिले व इतरांसाठी जगण्याने माणूस खरा सुखी होतो हा मंत्र दिला. मी आज समाजासाठी जे कार्य करीत आहे. ही त्यांचीच प्रेरणा आहे. आज महाराज नसल्याने मन गलबलून आले आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व ग्रंथ यथोचित देवून सत्कार केला.
शुकदास महाराजांचे कार्य अलौकीककार्याला सलाम
लाखो व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करतांना या महापुरूषाने स्वतःच्या आरोग्याकडे व व्यक्तीगत जगण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे महाराजांना आपल्यातून लवकर जावे लागले. सर्वसामान्यांना सुखापर्यंत पोहचविण्यासाठी शुकदास महाराजांनी स्वतःचे जीवन समर्पित केले. मी त्यांच्या कार्याला सलाम करते.
मातीशी इमान राखणारा वर्ग दुर्लक्षित
साध्या भोळया लोकांनी हा देश जीवंत ठेवला आहे. श्रम करणारा,मातीशी इमान राखणारा वर्ग दुर्लक्षित राहता कामा नये. संस्कार आणि देशसेवेचे व्रत स्वीकारलेला हा मोठा वर्ग मुख्य प्रवाहात सामील होणे व त्याचा विकास होणे म्हणजेच ख-या अर्थाने देश भक्कम करणे होय.
हदयाशी संवाद साधणारा खरा शिक्षक
शिकणे म्हणजे निर्मिती, समंजसपणा,मनाचा मोठेपणा,इतरांच्या सुखात सुख शोधणे होय. जे शिक्षण दुर्बलांना आधार देते.त्यांना ताठ मानेने जगणे शिकविते तेच खरे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा डोंगर नाही. तर हदयाशी संवाद साधण्याची कला.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा