Responsive Ads Here

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्धा

आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्धा

 एरवी संपूर्ण दिवस वैद्यकिय सेवेत मग्न असणारे... रूग्णसेवेमुळे कुटुंबासाठी सुध्दा फारसा वेळ देऊ न शकणारे... आपल्या रूग्णसेवेच्या माध्यमातून व्याधीग्रस्तांच्या व्याधीमुक्त करणा-या मेहकर येथील डॉक्टर्स ग्रुपने  नुकत्याच वाशिम येथे पार पडलेल्या ब्रेवेट स्पर्धेत सहभाग नोंदवित २०० किमी स्पर्धा पहिल्याच तयारीत यशस्वी केली. प्रथमच वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तींनी ब्रेवेट स्पर्धा यशस्वी केल्याने त्यांचे परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे.
वाशिम रॉदिनियर्स क्लबने रविवारी (दि.१८) रोजी आयोजित केलेल्या २०० किमी मीटरची ब्रेवेट स्पर्धा मेहकर येथील डॉक्टरांनी केवळ १३ तास ३० मिनीटामध्ये पूर्ण केले. वाशिम येथून सुरू झालेल्या या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धा मालेगांव,मेडशी,पातूर,अकोला मार्गे बाळापूर परत बाळापूर,अकोला,पातूर,मेडशी,मालेगांव मार्गे वाशिम अशी एकून २०० किलोमीटरचा प्रवास या डॉक्टराच्या ग्रुपने केवळ १३ तास ३० मिनीटात यशस्वी पूर्ण केली. यामध्ये मेहकर येथील नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रशांत दिवठाणे,स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रमोद जाधव,दंतरोग तज्ञ डॉ.अमित जोशी,हृदयरोगतज्ञ डॉ.गजानन कुळसुंदर,बालरोगतज्ञ डॉ.विनायक चांगाडे,जनरल सर्जन डॉ.अनिल राठोड,शिक्षक प्रमोद भालेराव,चेतन शर्मा असे एकून ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
वाशिम येथून सुरू झालेल्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बालरोगतज्ञ डॉ.आशिष नरवाडे,फॅमिली फिजीशियन डॉ.सुनिल भराडे यांनी सहकार्य केले होते. तर ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून वाशिम येथील सौ.अलका गि-हे व पवन शर्मा यांनी सायकलिंगला पुढे नेण्यास सहकार्य केले. जनमानसात आरोग्याबाबत जागृती व व्यायामाचे जीवनातील महत्व पटविण्यासाठी आपण स्पर्धेत सहभागी झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी बोलतांना सांगीतले. मेहकर येथील वैद्यकिय क्षेत्रात असलेला हा डॉक्टर्सचा ग्रुप नियमीतपणे २५ ते ३० किलोमीटर सायकलिंग करत असल्याचे दै.सकाळशी बोलतांना सांगीतले.

असे आहेत सायकलिंग फायदे
सायकलिंग हा शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी सहज करता येणारा व्यायाम असून नियमीत सायकलिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. सायकलिंगच्या नियमीत व्यायामाने शरीरातील अतिरीक्त चरबी जळून लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते. मेंदूकडे रक्तपुरवठा सुरळीतपणे प्रवाहित झाल्याने मेंदूच्या कार्यक्षता वाढून रोगप्रतिकारक्षमता वाढते.

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाला नकळत अनेक व्याधी जडतात. प्रत्येकाने नियमीत स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम,संतुलीत आहार व व्यसनापासून दूर राहल्यास अनेक व्याधींना दूर राखता येईल.
डॉ.प्रशांत दिवठाणे नेत्ररोगतज्ञ ,मेहकर

1 टिप्पणी: