हिंसा, व्देष व विषमतायुक्त जगाला बुध्द चिंतन हाच पर्याय - किरण डोंगरदिवे


विवेकानंद आश्रमात बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात केले प्रतिपादन
आजच्या जगात प्रगतीच्या नावाखाली, सीमा विस्तारासाठी अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अण्वस्त्र जग मानव आणि मानवतेच्या मुळावर उठले आहे. धर्माधर्मातील व्देष, विषमता जगाला विनाशाकडे घेवून जात असतांना भगवान बुध्दांचे जीवन व तत्‍वज्ञानाचे चिंतन हाच श्रेष्ठ पर्याय जगासमोर शिल्लक असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द कवी किरण डोंगरदिवे यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित बुध्द पौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. प्रज्ञावंतांनी शीलवान असावे व करूणाबुध्दी धारण करावी असे करणे ही मानवाची अधिकत्‍तम गुणवत्‍ता आहे. स्वामी विवेकानंदांनी  भगवान बुध्दांकडून करूणेचा स्वीकार केला म्हणूनच स्वामी विवेकानंदांचे हृदय दीन, दुःखी, पीडीत महिला यांच्यासाठी कासावीस झाले व भारतीयांसाठी ते मोठे कार्य करू शकले.  त्‍यांनी धर्मविषयक नवी संकल्पना  मांडली, त्‍यात मानवसेवेलाच महत्‍व दिले. त्‍यांच्या विचारांचा तोच धागा पकडून प. पू. शुकदास महाराजांनी मानवाला केंद्रस्थानी मानून त्‍याची सेवा केली असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमेचे पूजन व  पंचशील ग्रहण करण्यात आले.  सज्जनसिंह राजपूत यांनी बुध्द वंदना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी हे होते.  प्रमुख उपस्थितीत साहित्‍यिक शिवाजीराव घोंगडे, अशोक थोरहाते, प्राचार्य आर. डी. पवार हे होते. शिवाजीराव घोंगडे यांनी प. पू. शुकदास महाराजांनी गावकुसा बाहेर राहणाऱ्यांना, कष्टकरी, श्रमजीवी, वंचितांना आश्रमात समावून घेतले. त्‍यांनी कोणताच भेद बाळगला नाही. मानव कल्याणासाठी अहोरात्र जीवन जगून विवेकानंद आश्रम सारखी सुंदर संस्था मानव सेवेसाठी निर्माण केली. महाराजांच्या जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेले तत्‍व आढळून येतात असे विचार त्‍यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव हिवाळे यांनी केले. यावेळी संतोष गोरे, पुरूषोत्‍तम आकोटकर, अशोक गिऱ्हे, पंढरीनाथ शेळके, पत्रकार संतोष थोरहाते, राजेश रौंदळकर, मधुकर वानखेडे, बी.टी.सरकटे, जी.डी. तायडे, नितीन इंगळे,संजय कंकाळ,समाधान बनसोडे,भिकेश इंगळे, विश्वजीत गवई,माणिक गवई,अनिल वानखेडे, पोलीस पाटील रवि घोंगडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य आर.डी.पवार यांनी केले.

विवेकानंद आश्रमात महात्‍मा बसवेश्वर जयंती साजरी

 थोर समाज सुधारक तसचे वर्णभेद,जातीभेद या विषमतावादी विचारांना मानवी जीवनातून हद्दपार करण्यासाठी चळवळ उभी करणारे महात्‍मा बसवेश्वर. त्‍यांची जयंती विवेकानंद आश्रमात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुप्रसिध्द गायक सज्जनसिंह राजपूत, वादक निलेश थोरहाते यांच्या भक्तीगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राचार्य आर डी पवार आपल्या भाषणात म्हणाले, महात्‍मा बसवेश्वरांच्या विचारात लोकशाही मूल्यांची तत्‍वे होती. त्‍यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीयांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग, जातीप्रथा निर्मूलन, आंतरजातीय विवाह प्रोत्‍साहन या समाजाला एकसंघ ठेवणाऱ्या मानवतावादी विचारांचा प्रसार केला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप या संकल्पनेतून आधुनिक राज्य व्यवस्थेचे प्रारूप निर्माण केले. कर्मप्रधान जीवनशैली स्वीकारून परमेश्वर प्राप्तीचा संदेश दिला. त्‍यानंतर सौ.वनिता सांबपूरे यांनी महात्‍मा बसवेश्वरांच्या जीवनावरील दीर्घ काव्य सादर केले. सत्‍पुरूषांचे विचार कालातीत असतात. एक हजार वर्षापूर्वी बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीची गरज आजच्या नवसमाज रचनेला आवश्यक भासत आहे. महात्‍मा बसवेश्वर ते स्वामी विवेकानंद आणि प.पू.शुकदास महाराज हा विचारांचा त्रिकोण कर्नाटक,बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत प्रवाहीत झाला. प.पू.शुकदास महाराजांनी स्वीकारलेला कर्मयोग बसवेश्वरांच्या शिकवणूकीतून त्‍यांना प्राप्त झाल्याचे संतोष गोरे यांनी सांगितले. कृषि सहाय्यक यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अशोक थोरहाते, वसंतआप्पा सांबपूरे, बेलाप्पा धाडकर, डॉ.जगदीश सांबपूरे, शिवदास सांबपूरे, सागर उर्किडे, अनिल बोरकर, विलास तामस्कर, संजय तोडकर,  सातरकर आप्पाजी, मनोज डोंगरे,डॉ.सुनिल देशमाने, सतिष धाडकर, डॉ. तुपकरी, नागेश तोडकर, योगेश तोडकर, डॉ.तेजस सांबपूरे, श्याम तामस्कर, इत्‍यादी  मान्यवर उपस्थित होते.

विवेकानंद आश्रम ज्ञानगंगेचा भगीरथ - शिक्षण उपसंचालक डॉ.पानझाडे

भगीरथाने प्रयत्‍नांची पराकाष्टा करून लक्षावधीजीवांना तसेच पशू पक्षी व निसर्ग यांना जीवन देणाऱ्या गंगेला अवतीर्ण केले अशी अख्यायिकाआहे त्‍याचप्रमाणे प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील, तळागाळातील उपेक्षित आणिवंचितांचे जीवन समृध्द व शहाणे करण्यासाठी उजाड आणि निर्मनुष्य माळरानावर ज्ञानगंगाअवतीर्ण केली व लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी जीवन बहाल केले असे उदगार महाराष्ट्रराज्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे पुणे यांनी विवेकानंद आश्रमास भेटी प्रसंगीकाढले. शिक्षण व ज्ञान ही सर्वोच शक्ती आहे. त्‍यामुळेच मानवी जीवनाला अर्थ प्राप्तहोतो. शिक्षणासोबत स्वावलंबन, सदाचार या मुल्यांना प्राधान्य देत आल्यामुळे या संस्थेच्याशाळा व महाविद्यालयाची प्रगती झाली. शिक्षणाला व्यवसायाचे रूप न येवू देता. ती सेवाआहे व या सेवेचे व्रत आपण स्विकारले आहे अशी भूमिका प्रत्‍येक शाळेने घेतल्यास विद्यार्थ्यांनाअपेक्षीत मुलभूत भौतिक सोयी सुविधांची कमतरता पडणार नाही असे विचारही त्‍यांनी यावेळीव्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्‍यांचेपुष्पगुच्छ व ग्रंथ देवून स्वागत केले. संस्थेच्या सर्व सेवाउपक्रमांना यावेळी त्‍यांनीभेट दिली. विवेकानंद स्मारक हे पर्यटकांसाठी मिनी कन्याकुमारी आहे. याठिकाणी आल्यानंतरविवेकानंदांच्या दिव्य विचारांची,त्‍यांच्या तत्‍वज्ञानाची प्रेरणा प्रत्‍येकाच्याअंर्तमनाला स्पर्श करून जाते. आश्रमाने केलेले निसर्गाचे संवर्धन त्‍यामुळे नजरेस पडणारीहिरवी झाडी परिसराची स्वच्छता आणि निळाशार जलाशय अत्‍यंत नयनरम्य आहे. शिक्षणातील मुलींचाटक्का वाढविणे गरजेचे आहे. शाळा बाह्य मुले शोधणे व त्‍यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे तसेचमराठी शाळा टिकून राहणे हे शिक्षण विभागा समोरील मोठे आव्हान आहे परंतु शिक्षण क्षेत्रातीलसर्व संस्था, शिक्षक, पालक व समाजातील सर्व घटक हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज व सक्षमआहे असे विचारही त्‍यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.  याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, विश्वस्त कैलास भिसडे, प्राचार्य आर. डी. पवार, प्रा. गणेश चिंचोले इत्‍यादी मान्यवर उपस्थितहोते.

पुस्तक वाचा, ज्ञान संपादन करा, गतीमान व्हा व ध्येयाप्रर्यंत पोहचा

पुस्तक हे ज्ञान प्रसाराचे अध्ययन, अध्यापनाचे ,विचार प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मुद्रण कला विकसीत होण्याच्या अगोदर एखादा विचार, ओवी, कवीता, श्लोक यांना कंठस्त करण्याची पध्दती होती. परंतु ज्यावेळेला विचार, संकल्पना यांची मांडणी पुस्तक रूपाने सुरू झाली अगदी तेंव्हा पासून ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली झाली. काहीकाळ वाचनाची आवड ही परमोच्च बिंदूवर होती परंतु आज वाचन कला ही शेवटची घटका मोजत असून ज्या दिवशी हातातील पुस्तकाची जागा यंत्र घेईल. त्‍यादिवशी जगातील एका मोठया आनंदाला व सुखाला आपण गमावून बसू. पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद हा नवविचारांचा स्पर्श झाल्याची अनुभूती देतो असे मत वाचन चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या  सौ. सुनिता गोरे यांनी दैनिक सकाळशी संवाद साधतांना व्यक्त केले. हल्ली  वाचनालयाकडे  कोणाचे पाऊले वळतांना दिसत नाहीत. पुस्तक विकत घेवून वाचावे व संग्रही ठेवावे अशी धारणा असणारे वाचकही पुढच्या पिढीला पाहावयास मिळतील का ? दरवर्षी बंद पडणाऱ्या प्रकाशन संस्था, छापली जाणारी पुस्तके व ग्रंथे कमी होत आहेत. त्‍यामुळे हे वैचारीक दारीद्रय विकसीत भारतात पाहायला मिळणार आहे का? असेल तर ते दुर्दैव आहे. प्रत्‍येकाच्या घरात छोटशी लायब्ररी असणे त्‍याच्या बौध्दीक व वैचारिक संपन्नतेचे लक्षण आहे. एखाद्या बापाने मुलाच्या वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावी. मित्र, मैत्रीणीला ग्रंथ गिफ्ट करावी तरच वाचनाची चळवळ गतीशील राहील. माझ्या घरात माझे स्वर्गीय सासरे टी.टी.गोरे यांनी जमा केलेली पुस्तके आहेत. आज त्‍यात भर घालून छोटशी लायब्ररी मी निर्माण करू शकले. विवेकानंद चरित्र, श्यामची आई, बटाटयाची चाळ यासारखी अनेक पुस्तके वाचून काढली. आज जागतिक पुस्तक दिन आहे आजपासूच सुरूवात करू या. संकल्प करू सिद्धीस नेऊ. सकाळच्या या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळेल व  वाचन चळवळ समृध्द होईल अशी अपेक्षा आहे.

 

सकाळ समूह सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था

सकाळ समूहासारखी वाचन संस्कृतीस चालना देणारी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था त्‍यादृष्टीने काम करीत आहे. सकाळने मराठी माणसाचे वैचारीक भरण पोषण केले याचा आनंद होतो.

 

सुनिता गोरे यांच्या कपाटात १२०० पुस्तके

सौ. सुनिता  गोरे यांच्या कपाटात १२०० पेक्षा अधिक पुस्तकांची संख्या आहे. त्‍यात महापुरूषांची चरित्रे ,विवेकानंदांचे सम्रग खंड, बालसाहित्‍य उपलब्ध आहे. ग्रामीण भागात वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी त्‍या प्रयत्‍नशील असतात. 


शेती मशागतीच्या दरातील वाढीमुळे बळीराजा मेटाकुटीला



पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्‍यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. सद्या हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतात नांगरीणी, वखरणी, पंची, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहे. दिवसें दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी बळीराजाचे शेतमशागतीची गणित चांगले महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती मशागतीचे कामे करण्यास प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी नांगरणी,वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशूधनाच्या मदतीने करत होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीचे कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी,वखरणी,पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाडयाच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केल्या जातात. मात्र पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्‍याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्‍यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्‍यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत पडून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघार्इला आले. आहे. आता मशागतीचे दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे.


शेती मशागतीच्या दरात वाढ

यापूर्वी नांगरणीसाठी एका घंटयासाठी  500 रूपये होते त्यासाठी आता 700 रुपये मोजावे लागतात. रोटाव्हेटरला यापूर्वी ८00 रूपये लागत होत मात्र इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी १००० मोजावे लागतात तर पंजीसाठी मागच्या वर्षी 500 रूपये लागत होत त्यासाठी आता ७00 रूपये लागत आहेत.