मुंबई : निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे.
२२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २८ व २९ ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. २८ ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते, तर २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी अर्ज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.
या उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. दोन नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर तीन नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुटी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारीचा शासकीय प्रक्रिया नसेल. मात्र, चार नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघात माघारीच्या घडामोडींना वेग येणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून (ता. २२) सुरुवात होणार असली, तरी या निवडणुकांचा मोठा अनुभव असलेल्यांकडून तत्पूर्वीच डमी अर्ज भरून तो या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासून घेतला जातो. अर्जासोबत जोडावी लागणारी संपत्तीची माहिती, शैक्षणिक पात्रतेसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याबरोबरच कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी उमेदवारांकडे वकिलांसह तज्ज्ञांची फौज कार्यरत आहे. अनेक पक्षांकडून सर्व उमेदवारांची ही प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत आहे. अशा यंत्रणांनाही यानिमित्ताने ‘अलर्ट’ राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.
भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले असून मनसे, वंचित व अन्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही जणांना एबी फार्मचे वाटप करण्यात आले आहे. उबाठा सेना, शिंदे शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, कॉग्रेसकडून उमेदवारांची यादी जवळपास ‘फायनल’ होत आली असून लवकरच ही यादी जाहीर होणार आहे.
Thanks for this article! If you're interested in job-related updates and career guidance, here are some great resources:
उत्तर द्याहटवाhttps://www.naukrikendra.in