विवेकानंद आश्रम परिसर माणूस घडविणारा- तहसिलदार डॉ.संजय गरकल


 शिक्षण माणसाला शहाणपण देते,सुज्ञपणा देते,लोकशाही मूल्यांची व विधायक कार्यासाठी लागणारी वर्तनक्षमता शिक्षणाने प्राप्त होते. शैक्षणिक दृष्टया अत्यंत सुयोग्य असलेला हा परिसर आहे. या ठिकाणी शिक्षणासोबत इतर मूल्यांची बांधलकी जोपासत सुजान नागरीक तयार होतो. कारण विवेकानंद आश्रमाचा परिसर हा माणूस घडविणारा आहे असे विचार मेहकरचे तहसिलदार डॉ. संजय गरकल यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता.८) रोजी पदवी वितरण बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील होते. पदवीनंतर उच्चशिक्षण घेवून विविध क्षेत्रात करीयर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमाची कास धरावी. सेवाक्षेत्रात काम केल्याने देशाची सेवा घडते. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सव वर्षात प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.  अमरावती विद्यापीठाच्या संग्लनीत असलेले हे महाविद्यालय गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणासाठी सर्वदूर परिचीत आहे. शिक्षणासोबतच स्वावलंबन,संस्कार या गुणांची पायाभरणी महाविद्यालयीन जीवनातच होत असल्याने विद्यार्थी जीवनात यशस्वी होत आहेत. यावर्षीच्या गुणवत्ता यादीत मुलींची संख्या जास्त असल्याचे समाधान आहे असे विचार प्राचार्य डॉ.पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व पाहूण्यांच्या स्वागतांने झाली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विषयांच्या १०९ विद्यार्थ्यांना पदवी वितरण कारण्यात आली. शाम शेळके व प्रतिक्षा गवई या  पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा व प्रात्यक्षिक परिक्षांचा सराव अत्यंत उपयुक्त ठरला असून भविष्यात पदव्युत्तर पदवीसाठी त्यांचा उपयोग होणार आहे. स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा लाभही या महाविद्यालयातून झाला असून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील,प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन वैष्णवी बोरकर,अनुजा चंद्रवंशी तर आभारप्रदर्शन इश्वरी आमले हीने केले.

विवेकानंद आश्रमात बुध्द पौर्णिमा साजरी

 


विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी करण्यात आली. विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दाच्या प्रतिमेसमोर भाविक जमा झाले होते. सकाळी ८ वाजता झालेल्या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भगवान बुध्ददेवांनी संपूर्ण जगाला शांती आणि करूणेचा संदेश दिला. सर्व जीवांशी करूणेच्या भावनेतून वागणूक निर्माण झाली तर सर्व व्देष आणि शत्रूमुक्त जीवन जगतील. परस्परांचे सहजीवन चारित्र्य नावाच्या मूल्यांने जोडले गेल्यास ते जीवन सुखी आणि सार्थकी होईल असे विचार संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. भगवान बुध्दांच्या जीवनातील सर्व पैलू व त्‍यांचा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून व प.पू.शुकदास महाराजांच्या चरित्रातून आढळतो. मानवाचे कल्याण हाच बुध्दतत्‍वज्ञानाचा पाया आहे. समाजाची सेवा करण्यासाठी विवेकानंद आश्रमात सुरू झालेले सेवाउपक्रम ही खरी उपासना असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर.डी.पवार,डी.भास्कर महाराज,अशोक गिऱ्हे व माजी नायब तहसिलदार बी.टी.सरकटे यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व परिसरातील नागरीक मोठया उपस्थित होते. 

विवेकानंद स्मारक राज्यातील अग्रगण्य पर्यटन केंद्र बनणार - आ.डॉ.संजय रायमूलकर

 

शासनाची पर्यटनक्षेत्र विकासाची महत्‍वकांक्षी योजना आहे. पर्यटनक्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराची समस्या कमी होऊन वाढत्‍या व्यवसाने महसूलातही भर पडते. बुलडाणा जिल्हा पर्यटनदृष्टया महत्‍वाचा असून जिल्हयातील सिंदखेड राजा, लोणार, विवेकानंद आश्रम,  शेगाव इत्‍यादी पर्यटनस्थळे विकासाच्या टप्यात आहेत. मेहकर मतदार संघात असलेले विवेकानंद स्मारक हे अव्दितीय असे पर्यटनकेंद्र बनून नावारूपास येत असून कोराडी धरणाच्या मध्ये असलेल्या सहा एकराच्या बेटावर निर्माण केलेले विवेकानंद स्मारक हे अल्पावधीतच राज्यातील पर्यटनक्षेत्रांच्या यादीत अग्रगण्य केंद्र बनणार असल्याचा आशावाद मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी रविवारी (ता. १५) रोजी विवेकानंद स्मारकास भेट दिल्यानंतर बोलतांना व्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी त्‍यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्‍यांच्या सोबत संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. बोटीने विवेकानंद स्मारकावर जाऊन त्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्‍न करेल व शासन दरबारी पाठपुरावा करून विकासासाठी निधी खेचून आणेल असे विचार त्‍यांनी यावेळी व्यक्त केले. पर्यटन हा व्यवसाय असून पर्यटकांच्या संख्येवर व त्‍यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांवर हा व्यवसाय अवलंबून आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारका नंतर देशातील हे सर्वात मोठे विवेकानदं स्मारक बनणार असल्याचे व त्‍यासाठी विवेकानंद आश्रमासोबत शासनाच्या सहकार्याने मदत करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. स्मारकानंतर त्‍यांनी हरिहरतीर्थाला भेटी दिली. या ठिकाणी असलेले मनमोहक शिव गार्डन सुध्दा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. या परिसरातील प्राचीन मंदिरे अखंड वाहणारी जलधारा,गो संगोपन केंद्राला त्‍यांनी भेट दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती दिलीपबापू देशमुख,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,माजी अध्यक्ष महाराष्ट्र अर्बनचे बबनराव भोसले,जि.प.सदस्य तथा गटनेते आशीष रहाटे,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,माजी उपसभापती बननराव लहाने,माजी.पं.स.सदस्य गजानन पाटील,सरपंच मनोहर गिऱ्हे,शाखा प्रमुख विठ्ठल भाकडे,पत्रकार यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


विवेकानंद ज्ञानपीठच्या सौरभची नवोदयसाठी हिमाचलमध्ये निवड


 विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक संकुल हे नर्सरी ते पदवी पर्यंतच्या दर्जेदार व गुणवत्‍तायुक्त शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी सुरू केलेला आरोग्य, कृषी, शिक्षण, ज्ञाननिर्मिती, ग्रामविकास त्‍यातून मानव कल्याणाचा महायज्ञ आश्रमात तेवत ठेवला आहे. संस्थेव्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठ  ही निवासी  इंग्रजी माध्यमाची शाळा अल्पावधीच यशाचे अनेक शिखरे पार करीत आहे. नुकत्‍याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ज्ञानपीठात शिकलेला सौरभ कुरूडे यांची नवोदय विद्यालयातून पुढील शिक्षणासाठी हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. सौरभ हा विवेकानंद ज्ञानपीठात  शिक्षण घेतलेला व वसतिगृहात राहीलेला विद्यार्थी आहे. मूळचा हिंगोली जिल्हयातील सौरभ पाचव्या वर्गापर्यंत त्‍याने विवेकानंद ज्ञानपीठात शिक्षण घेतले. सहाव्या वर्गात त्‍याची नवोदय विद्यालयात शेगांव येथे निवड झाली. शेगाव येथील विद्यार्थ्यांमधून वर्ग ९ वी साठी त्‍याची हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. विवेकानंद आश्रमात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सौरभ सारख्या ग्रामीण भागातून व गरीब कुटूंबातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आश्रमाचे शैक्षणिक संकुलाने जीवनात यश मिळवून दिले आहे. शैक्षणिक गुणवत्‍ता देण्यासाठी हा परिसर सदैव तयार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या ज्ञानपीठात शिक्षणासोबतच नवोदय विद्यालयासाठी व स्कॉलरशिपसाठी  तयारी वर्गाचे नियोजन केल्या जाते.त्‍याचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे.  सौरभच्या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्‍याचे कौतुक केले आहे.

 

 

कृतिशील शिक्षकाच्या शिबीरातून तेवली चिमुकल्यांच्या ज्ञानाची ज्योती !

हिवरा आश्रम : शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनंत शेळके 
आधुनिक जग हे खूप गतिमान आहे. संगणक आणि स्मार्टफोनच्या विश्वात चिमुकल्यांचे भावविश्व कोमजून जात आहे. माणूसकी,आत्‍मीयता दया, परोपकार, अध्यात्‍म या गोष्टी हद्दपार होत आहे. त्‍यामुळे भावी पिढीमध्ये सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल व उद्याच्या सुसंस्कृत पिढीच्या जडणघडणीसाठी संस्कारक्षम मानसिकता व दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे. बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून चिमुकल्यांना हसतखेळत शिक्षणाचा आनंद लुटता यावा. मुलांच्या दर्जेदार व सर्वांगिण शिक्षणाची ही गरज ओळखून हिवरा आश्रम येथील विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. विवेकानंद ध्यान केंद्राव्दारे आयोजित शिबीराला १ मे पासून प्रारंभ झाला असून हे दि.१६ जून रोजी सदर शिबीराचा समारोप होणार आहे. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्‍व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील १५० ते २०० मुलांचा सक्रिय सहभाग मिळाला आहे. बालमनावर नैतिकता, निर्भीडपणा, सत्‍याचरण, निर्व्यसनी, प्रामाणिकता, सचोटी,थोर महापुरूषांचे जीवनचरीत्रा सोबत मूल्यांचे संवर्धन या शिबीरात सातत्‍याने होत असल्याची माहिती विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना दिली. या शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरण, तणावमुक्त शिक्षण पध्दतीत शिकविले जाते. विवेकानंद ध्यान केंद्राच्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना मिळून मुलांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. परिसर,पर्यावरण,समाज,स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.

  चिमुकल्यांना शाळेबाहेच्या जगाची अनुभूती 
 या बालसंस्कार शिबीरात श्लोक,सुसंस्कार, इंग्रजी भाषा, संभाषण कौशल्य, बौध्दिक क्षमतांचा विकास, चर्चा सत्र, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम, कागदापासून पिशवी व फुले बनविणे, चित्रकला, रंगभरण स्पर्धा, मनोरंजक खेळ, स्टेज डेअरींग, प्रार्थना, कथाकथन, हरिपाठ, पाऊली या विविध विषयावर शिक्षकतज्ञ शिबीरार्थींना मार्गदर्शन करीत आहे.

 कोरोनामुळे उन्हाळी शिबीराला खंड पडला मात्र आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे यावर्षी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. या उन्हाळी शिबीराच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. संस्काराच्या शिदोरीतून नवीन पिढी घडत आहे. यामध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्‍यंत गरज आहे. त्‍यामुळेच या शिबीरात उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात येत आहे.
  अनंत शेळके संचालक विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रम