उन्हाच्या दाहकतेमुळे वाढल्या पशूपालकांच्या चिंता

             
जगाचे होणारे आधुनिकीकरण त्यासोबत ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणारे झपाट्याने बदल यांचा फटका प्रत्येकाला सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवसे तापमानात होणा-या  वाढीमुळे आता पशूपालकांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दृश्य मेहकर तालुक्यात दिसून येत आहे. उन्हाची दाहकता कमी होता ती अधिकच तीव्र होत असल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त होत आहे. मेहकर तालुक्यातील तापमान ४० अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे संपूर्ण पशूधनपालक उष्णतेपासून पशूधनाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करतांना दिसत आहे. त्यातच काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय शेतक-यासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दुपारच्या उष्ण झळापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी गोठयाच्या भोवताली तु-हाटयांचा कूड शेतकरी लावत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांना सावली मिळावी म्हणून काही शेतकरी ग्रीन नेटचा वापर करीत आहे. उन्हाळयात जनावरांना साधारणपणे उष्माघात हा आजार होत असतो. उन्हाळयात तापमान ४० ते ४३ अंशांवर 
गेल्यास जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. महाराष्ट्र ,विदर्भ,मराठवाडा खांदेश या भागात उन्हाळयात हा आजार उदभवतो. महाराष्ट्रात दरवर्षी उष्माघाताने १० टक्के जनावरे दगावतात. शरीरातील तापमान १०५ फॅ-हेनाईटपेक्षा जास्त वाढून जनावरे चारापाणी बंद करतात.

अशी आहे उष्माघाताची लक्षणे
या रोगामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. डोळे खोल जातात. तोंडास कोरड पडते. जनावर तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वास घेतात. त्यांना धाप लागते. नाडी जलद चालते. शरीराचे तापमान १०५ फॅ-हेनाईट अंश पुढे वाढते. जनावर एक टक लावून पाहतात. जनावरांच्या सर्व अंगास घाम फुटतो. त्वरित उपचार केल्यास जनावर दगावते. 

उन्हाळायच्या दिवसात गाई,म्ह्शी भर  उन्हात  बांधू नका. जनावरांना झाडाच्या सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. जनावरांना  भरपूर पाणी पिण्यास द्यावे. जनावरांच्या अंगावर बर्फाचे थंड पाणी शिंपडावे. शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी. त्वरीत पशूवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
            डॉ.सुनील देशमाने, पशुधन पर्यवेक्षक,विवेकानंद कृषि महाविद्यालय 


दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजवावा.- उपविभागीय अधिकारी देशपांडे


लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा सर्वांत महत्वाचा घटक आहे. मतदानाच्या माध्यमातून आपल्या मिळालेल्या अधिकाराचा वापर करता येतो. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यांगांना मतदान करतांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी शासनाकडून सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी केले.
समाज कल्याण विभाग बुलडाणा विवेकानंद निवास अपंग कर्णबधिर  विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मतदान जनजागृती व्ही.व्ही पॅट मशीन कार्यशाळेत दिव्यांगांना मार्गदर्शन प्रसंगी ते शुक्रवार ता. रोजी बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके,अपंग विद्यालयाचे प्राचार्य सुनिता गोरे,व्ही व्ही पॅट मशीन प्रशिक्षक लक्ष्मण सानप,मुकेश काळे तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना देशपांडे म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी आपल्या मताचे महत्व ओळखावे. मतदान  करणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांनी मतदान करून मताची टक्केवारी वाढवावी. दिव्यांगांना मतदान करतांना कुठलीही अडचण येणार नाही. दिव्यांगांना मतदान केंद्र ठिकाणी येण्या जाण्याची सुविधा ठेवण्यात येणार आहे.असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पंढरीनाथ शेळके तर सुत्रसंचालन प्रमोद सावरकर तर  आभार प्रदर्शन प्राचार्या सुनीता गोरे यांनी मानले.

दिव्यांगांना व्ही व्ही पॅट मशीन प्रशिक्षण
या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांना व्ही व्ही पॅट मशिनद्वारे  प्रशिक्षण देण्यात आले. व्ही.व्ही.पॅट मशिनवर मतदान प्रशिक्षणामुळे दिव्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. देऊन दिव्यांग मतदारांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला.
 दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिवरा आश्रम येथे दिव्यांग मतदार बांधवांसाठी व्ही.व्ही पॅट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत हिवरा आश्रम,हिवरा बु,ब्रम्हपूरी,दुधा तसेच मेहकर तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८